रंग जीवनाचे ...

  

 रंग जीवनाचे ...

आपल्या दैनंदिन जीवनात रंगांचं खूप जास्त महत्त्व असत. आपल्या कळत नकळत आपलं रंगांशी खूप जवळच नातं जोडलं जात. कपडे, ज्वेलरी, गाड्या, घरं, घरांची सजावट, वाढदिवसांच्या थीम्स आणि बरच काही. अगदी जेवणसुद्धा पहिले डोळ्यांनी जेवलं जात असं म्हणतात. निसर्गात तर रंगांची अगदी उधळण झालेली असते. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये निसर्गात दडलेल्या अनेक रंगांच्या छटा पाहायला मिळतात. तर ह्या रंगांचं दर्शन आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थिती आणि माणसंही करून देत असतात.  

जन्म आणि मृत्यू या दोघांमधला प्रवास म्हणजे "जीवन". आपलं जीवनात स्वागत अश्या दोन व्यक्तींकडून होत जे आयुष्याच्या चढ - उतार, उन्हाळा- पावसाळ्यात शेवटपर्यंत साथ देतात. आपण अनोळखी माणसांसोबत सहज बोलतसुद्धा नाही पण आई-वडील नऊ महिने न पाहिलेल्या व्यक्तीवर प्रेम करतात आणि शेवटपर्यंत करत राहतात. लहानपणी आई- आजीकडून काळ्या रंगाच काजल आणि टिळा लावून वाईट आणि राक्षसी प्रवृत्तीनपासून रक्षण केलं जात. आईच्या साडीच्या रंगावरून गर्दीत चालताना तिला शोधायच्या करामती तुम्हीही केल्या असतील. बालपणात खेळणं बागडणं , मित्रांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणं, सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवणं म्हणजेच आयुष्य वाटत. आपल्याला हवं तस यश मिळत असत आणि आयुष्य कस मजेत चाललेलं असत. सर्वांकडून खूप प्रेम मिळत असत आणि "लाल" रंग प्रेमाचा हे मनाने पक्कं केलेलं असत.  

नंतर पदार्पण किशोर वयात होत. शरीरातील हार्मोन्ससोबत आयुष्यातले हार्मोन्सपण भराभर बदलू लागतात जणू. गावात शिक्षणाची सोय नसेल तर नवीन शहरात जावं लागत. नवीन कॉलेज, नवीन फ्रेंड्स, नवीन शिक्षक... पाटी पुन्हा नव्याने कोरी झालेली असते आणि आयुष्याची नव्याने सुरवात होते. पण ऊर्जा आणि जोश असणाऱ्या केशरी रंगाचा ह्या वयात इतका जास्त प्रभाव असतो कि सगळ्या गोष्टी आत्मसात होतात. आई-वडिलांपासून दूर झाल्याचं वाईट जरी वाटत असलं तरी मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा आनंदही असतोच. शाळा कॉलेजचे दिवस खूपच अविस्मरणीय ठरतात. डिग्री मिळवणं हा एकच उद्देश असतो आणि आपण आपल्या आईवडिलांसाठी अजूनही लहानच असतो.

वर्षं सरतात; कॉलेज संपत आणि अचानक आपण मोठे झाल्याचा अनुभव होतो. परीक्षेचा पेपर जरी सर्वांसाठी सारखा असला तरी आयुष्याचा पेपर मात्र सर्वांसाठी वेगवेगळा असतो. काहीजण नापास होऊनही आनंदी जगू शकतात तर काही पास होऊनही बावरलेले असतात. करिअर घडवायचं असत, जबाबदाऱ्या खुणावत असतात, आर्थिक- सामाजिक दडपण येतं आणि अश्यावेळी मात्र कोणत्याच रंगांचे ग्रह आपल्या बाजूने उभं राहायला तयार नसतात. संकट आली कि चहुबाजुंनी घेरून टाकतात. वादळात अडकलेल्या पालापाचोळ्यासारखी अवस्था होते. प्रेमाचे प्रतीक असणारा "लाल" रंग आता मात्र धोक्याची घंटा जोरजोरात वाजवत असतो. काळ्याकुट्ट गर्द अंधारात दूरदूरपर्यंत कुणीच दिसत नसत. पांढरा रंग शांततेएवजी उगाच जीवन अधिकच उदासीन करतो आणि अश्यावेळी जीव कसा गुदमरून जातो. असो ....   

 काही संकटातून बाहेर येण्यासाठी विशिष्ठ काळ लोटावाचं लागतो पण हा काळ खूप काही शिकवून जातो. बुडत्या नावेत सफर करायला कोणालाच आवडत नसतं आणि अश्यावेळी अगदी जवळची माणसंही गिरगीटासारखी रंग बदलून जातात. अपयशाची लेबलं लागतात. आत्मविश्वासाच्या कश्या चिंधड्या उडतात. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्यच चुकत जात. सोडवताना वाटत गुंता सुटत गेला पण प्रत्येकवेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहित नसते आणि चालणार्याचे मात्र ध्येय हरवून बसते. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात आणि तेंव्हाच "अनुभव" म्हणजे काय हे कळून चुकतं.   

नंतर सोन पाउलांनी लग्नाचं वय येतं आणि खऱ्या अर्थानी आयुष्य रंगून जातं. मंगल कार्यांमध्ये तर जवळपास सर्व रंगाचा वापर होतो. केशरी किंवा पिवळ्या रंगांची झेंडूची फुलं सूर्य, तेज आणि सकारात्मक ऊर्जेचं दर्शन घडवतात. हळदी- कुंकाचा प्रत्येक शुभकार्यात मान असतो. "कुंकू", हे संपत्ती, आनंद आणि भरभराटीच प्रतीक असणाऱ्या देवी महालक्ष्मीला संबोधित करत तर "हळद" पवित्रता, सौन्दर्य आणि चांगल्या आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. सौभाग्यलंकार असणारा हिरवा चुडा, हिरवी साडी आणि मंगळसूत्र स्त्रियांच्या सौन्दर्यात अजूनच भर घालतात. "मंगळसूत्र", मंगल म्हणजे पवित्र आणि सूत्र म्हणजे दोरा. तर ह्या मंगळसूत्रातील काळ्यामण्यांचा वाईट दृष्टींपासुन संरक्षण करण्याचा हेतू असतो. आयुष्याच्या नव्या वळणावर नवी नाती भेटतात आणि आशेचा नवा किरण उगवतो. 

वादळ, सोसाट्याचा वारा, पाऊस थांबतो. काळ लोटला कि वातावरण कस शांत, प्रसन्न होत. वसंत ऋतूसारखी सगळीकडे हिरवळ पसरते. गढूळ पाणी पुन्हा एकदा निवळतं. नद्या स्वच्छ, स्वछंद वाहू लागतात आणि जीवनात स्थिरता येते. रंगीबेरंगी फुलं बहरतात आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु होतो. जेंव्हा आपण आई-बाबा बनतो तेंव्हाही जबाबदाऱ्या असतातच पण आता त्यांचं ओझं वाटत नसतं. एकेकाळी संकटांच रूप धारण केलेल्या गोष्टी आता मात्र सोप्या वाटू लागतात. 


"ऋतू बदलतो, तसे दिवसही बदलतात, एकेकाळी निघून गेलेले आयुष्यात सहज परततात". विशेष म्हणजे आता आपण त्यांना अपयशी नसून सर्वगुणसंपन्न वाटतो. वेळ निघून जाते पण आठवणी नेहमी सोबत राहतात, आयुष्याच्या शिदोरीत अनुभवांचा ठेवा ठेऊन जातात. अश्याप्रकारे आयुष्यात परिस्थितीनुरूप रंग बदलणारी माणसं भेटत असतात. कोणास ठाऊक काहीजणांचे सर्व रंग अजून उलघडलेही नसतील कदाचित. तरीही जीवन खूप सुंदर आहे, थोड्याफार फरकाने तुमचं आणि आमचं अगदी सेम आहे. एवढ्या सुंदर आयुष्यासाठी देवाचे आभार मानुयात. पुढच्या आयुष्यात येणाऱ्या वादळांना सामावून घेण्याचं बळ दे एवढीच प्रार्थना करूयात.

जाता जाता मनात घर करून गेलेल्या हिंदी गाण्याच्या चार ओळी लिहिते.

 " तुफान को आना हैं, आकर चले जाना हैं  

   बादल हैं कुछ पल का, छा कर ढल जाना हैं 

   परछाईयाँ रह जाती, रह जाती निशाणी हैं      

   जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहाणी हैं "

                                                                                                                     - मंजुश्री खटकाळे जाधव  



Comments

Popular posts from this blog

Rang Jivnache